
अहमदनगर : लोणी येथील तेजस्वनी दिघे आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले. काही वेळातच दोघा जणांना त्रास होऊ लागला आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले
बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक अभ्यासासोबतच खाण्यापिण्याचीही मोठी काळजी घेत असल्याचं दिसतं. मात्र अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली. परंतु उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
तेजस्विनी मनोज दिघे असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तेजस्विनी हिचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तिचे आजोबा यातून बचावले आहेत.
यासंबंधी माहिती अशी की, लोणी येथील तेजस्वनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू होती. प्रवरानगर येथील केंद्रावर तिचा नंबर आला होता. विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते. गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. त्या दिवशी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले.
तिचे आजोबा भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. रात्रीचे शिळे अन्न खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. काही वेळातच दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोट दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. मात्र, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलला हलविण्यात आले.
तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू होते. एका बाजूला मृत्यूशी लढाई सुरू होती तर दुसरीकडे बारावीचे उरलेले पेपर बुडत होते. अखेर तेजस्विनी जगण्याची लढाईही हरली. सोमवारी तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तिचे आजोबा मात्र बचावले आहेत.
तेजस्विनी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने अभ्यासही केला होता. पहिले काही पेपर दिल्यानंतर तिच्यावर हे दुर्दैव ओढावले. त्यात तिचा मृत्यू झाला. तिचे आणि कुटुंबयांचेही स्वप्न भंगले.
