
सर्व शक्ती पणाला लावून २७ वर्षीय गणेश उगले १६०० मीटर धावला. त्याला चांगले गुणही मिळाले, आता फक्त गोळाफेक राहिली होती. पण नियतीच्या मनात वेगळंच सुरु होतं
राज्यात सध्या रिक्त असलेली पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मागील अनेक दिवसांपासून तयारी करत असलेले हजारो तरुण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मुंबईच्या कलिना येथे चालक पदाच्या ९९४ जागांसाठी सध्या भरती घेतली जात आहे. इथेच काल वाशिम जिल्ह्यातील काजळंबा येथील गणेश उत्तम उगले या २७ वर्षीय तरुणांचा १६०० मीटर धावल्यानंतर अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याची पोलीस होण्याची लढाई मैदानावरच संपली आहे.
गणेश हा उत्कृष्ट शरीरयष्टी असलेला, अभ्यासातही प्रचंड हुशार आणि मनमिळावू असलेला तरुण होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने आपलं बी ए चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवस पुण्यात एका खाजगी कंपनीत १५ हजार रुपये महिना इतक्या पगारावर नोकरी केली. त्या पैश्यावर घर चालवलं, लहान भावाला सैन्यात भरती केलं आणि मग स्वतः पोलीस व्हायचं, या ध्येयाने गावी परत येऊन भरतीची तयारी करू लागला.
याआधी दोन वेळा अगदी थोड्या गुणाने त्याची संधी हुकली होती. यावेळी मात्र काहीही झालं तरी यश मिळवायचंच या जिद्दीने त्याने मुंबई गाठली. शरीरातील सर्व शक्ती पणाला लावून १६०० मीटर धावला. त्यात त्याला चांगले गुणही मिळाले, आता फक्त गोळाफेक बाकी होती. पण नियतीच्या मनात काही वेगळाच डाव सुरू होता. १६०० मीटरचे अंतर कापून आल्यावर गणेशला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही कळण्या अगोदरच त्याची प्राणजोत मालवली.
गणेश सोबत तयारी करणारे त्याचे मित्र सांगतात यावेळी त्याने प्रचंड तयारी केली होती. मैदानावर तर त्याला पूर्ण गुण मिळणारच होते सोबत पेपरही चांगला गेला असता. त्याचं यावेळी पोलीस होणं पक्कं होतं पण दुर्दैवाने तो आम्हाला सोडून गेला. गणेशच्या पश्चात आता त्याचे आई-वडील, लहान भाऊ व सर्व गाव धाय मोकलून रडतोय. एक स्वप्न उमलण्याआधीच खुडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
