
सध्या जोरदार चर्चेत आलेल्या बागेश्वर दरबारच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतरल्या आहेत. बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बागेश्वर बाबाला आव्हान दिल्यावर आता हिंदू संघटनांनी आंदोलनाची हाक दिलीय. दिल्लीत रोहिणीमध्ये हिंदुत्ववादी संघटना सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहेत.
तर एकीकडे हिंदू संघटना बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ मैदानात उतरत असताना शंकराचार्यांनी मात्र बागेश्वर बाबाला आव्हान दिले आहे. जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग चमत्कार खरे मानू असं ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी आव्हान दिलंय. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती दाखल झालेत.

जोशीमठला यावं आणि भूस्खलन थांबवून दाखवावं……?
चमत्कार दाखवणाऱ्यांनी आधी जोशीमठला यावं आणि भूस्खलन थांबवून दाखवावं, तसं केल्यास मग आम्ही त्यांचा जयजयकार करु, त्यांना वंदन करु असं शंकराचार्यांनी म्हटले आहे. चमत्कार करत असाल तर धर्मांतरण थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, शांतता प्रस्थापित करा, तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरा तर नमस्कार करू, नाहीतर तुम्ही कपट करत आहात असं मानू असं शंकराचार्यांनी सुनावले आहे.
शंकराचार्यांनीही हात चलाकी करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले जो नारळ आम्ही आणला आहे, त्यातून चुणरी काढा किंवा सोने काढून दाखवा. त्यातून जनतेचे काय भले होणार? जो चमत्कार घडतो आहे, तो जनतेच्या हिताचा असो किंवा जनहितासाठी काही घडले तर आम्ही तुमचा जयकार करु.
दरम्यान, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तेथून पळ काढल्याचा दावा आहे. अंनिसने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असे जाहीर आव्हान दिलं होते.
कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री?
बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम मंदिराशी जोडलेले आहेत. त्यांचे देशभरात हजारो भक्त आहेत. छत्तरपूरमधील गाडा गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते. असं सांगितलं जातं की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा निर्मोही आखाडाशी जोडलेले होते.
