
मोदी सरकारचे कृषिक्षेत्रासाठी 14 हजार कोटी मंजूर..
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रातील मोदी सरकारने कृषिक्षेत्रासाठी एकूण 14 हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये पीक विज्ञान आणि डिजीटल कृषी मिशन योजनांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी 1 हजार 202 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी सात मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारने डिजिटल कृषी मिशनसाठी 2 हजार 817 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, पीक विज्ञान योजनेसाठी 3 हजार 979 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय शाश्वत पशुधन आरोग्यासाठी 1 हजार 702 कोटी रुपये, फलोत्पादन विकासासाठी 860 कोटी रुपये, कृषी शिक्षणासाठी 2 हजार 291 कोटी रुपये, आणि कृषी विज्ञान केंद्रांसाठी 1 हजार 202 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे.
याशिवाय गुजरातच्या सानंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याच्या प्रकल्पालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 300 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने मुंबई इंदौर या 309 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे रुळासाठी 18 हजार 36 कोटी रुपये खर्चालाही मंजुरी दिली आहे.
